Saturday, 17 March 2018

चकदेव (Chakdeo)

   दोन दिवसात कुठे जायचं यावर आम्हा मित्रांचा भरपूर खल चालला होता. मार्चचा दुसरा आठवडा होता, ऊन तापायला लागलं होतं मात्र अजून असह्य झालं नव्हतं. नंतर मुलांच्या परिक्षा सुरू होणार, त्याच्या आत एक ट्रेक करायचा होता. आधी हेळवाकजवळचा भैरवगड ठरवला. पण तिथल्या वनखात्याच्या कार्यालयात संपर्क केला असता तेथे जाण्याची परवानगी आहे मात्र मुक्कामाची नाही असे कळाले. एका दिवसात चालत हा २४ किमीचा ट्रेक करणे अवघड आहे. मग चकदेव हा सुटसुटीत पर्याय पुढे आला.
     बरेच जण दोन दिवसांत चकदेवसह महिमंडणगड व पर्वत असा जंबो ट्रेक करतात. आम्ही मात्र एवढी तंगडतोड करण्यापेक्षा एकच करायचा असं ठरवलं. भरपूर गप्पा व्हाव्यात आणि निवांत वेळ मिळावा हाच मुख्य उद्देश. चकदेव हा काही किल्ला नाही, ते प्रसिद्ध आहे ते पठारावरील चौकेश्वराच्या मंदिरासाठी व पठारावरून कोकणात उतरणार्‍या वाटेवरील थरारक शिड्यांसाठी.  चकदेवला जाण्यासाठी आधी खेड गाठावं लागतं. खेडहून खोपी, रघुवीर घाटमार्गे मेट शिंदी हे पायथ्याचे गाव आहे ३० किलोमीटरवर. यात शेवटचा चार किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे पण आमच्या मारुती स्विफ्टला काही अडचण आली नाही. खेडहून शिंदीला दुपारी ४ वाजता मुक्कामी एस्टी पण आहे. ज्यांना दुसर्‍या दिवशी शिड्यांवरून कोकणात  उतरायचे आहे त्यांना ती सोयीची पडते.
          आम्ही दुपारी साडेचारच्या सुमारास शिंदीत पोचलो. तिथे चौकातच चौकेश्वराकडे जाणाऱ्या पायवाटेचा दिशादर्शक फलक लावला आहे. पहिला अर्धा तास चांगलीच तीव्र चढण आहे. दोनतीन वेळा विश्रांती घेत एका कड्याच्या सावलीत विसावलो. इथून शिंदी गाव, महिमंडणगड, पर्वत, आरावपर्यंत आलेले कोयना जलाशयाचे (शिवसागर) पाणी असा नेत्रसुखद नजारा दिसत होता.  ज्यांच्याकडे आमची जेवणाची व मुक्कामाची सोय होती ते संतोष जंगम (९४२२३९३०२२) तिथेच भेटले. मग तेथून संतोषबरोबरच चकदेवकडे निघालो. गप्पा मारताना अनेक विषयांना स्पर्ष होत होता. केवळ पावसाळ्यात होणारी भातशेती, दुधदुभते, मधोत्पादन यावर येथील अर्थकारण अवलंबून आहे.
       वाटेत धायटीची झुडुपे व पांगाऱ्याची झाडे केशरी - लालसर फुलांनी फुलली होती. चकदेव गावात पोचलो तेव्हा  सूर्यबिंब पश्चिम क्षितिजाला टेकले होतं. अस्ताचलाला जाणाऱ्या त्या तेजोनिधीस कॅमेरात बंद करण्याचा प्रयत्न करून पाहिला. सूर्यास्ताचे विहंगम दृश्य आणि क्षितिजावर होणारी रंगाची उधळण दर वेळी नवीच भासते. चौकेश्वराच्या मंदिरामागे तो केशरी गोळा दिसेनासा झाल्यावर पावले संतोषच्या घराकडे वळली.
     चकदेव गावात वीज पोचली आहे. मोबाईल चार्जिंगला लावले. फक्कड चहाने संतोषच्या घरात आमचे स्वागत झाले. वेळ हाती होता म्हणून चौकेश्वराच्या दर्शनाला निघालो. जुन्या दगडी मंदिराचे विस्तारीकरण गावकऱ्यांनी केले आहे. मंदिरात शिवलिंग व रामपंचायतनाच्या सुंदर पितळी मूर्ती आहेत.
     आता रात्रीच्या जेवणाचे वेध लागले होते. तांदळाच्या भाकर्‍या, मिश्र कडधान्यांची उसळ, भात-आमटी व कुरडया असा फर्मास बेत होता. तृप्तीची ढेकर दिल्यावर शतपावलीस बाहेर पडलो. प्रदूषणविरहीत आकाशात तार्‍यांचा खच पडला होता. हाताने तोडून घेता येतील इतकी ती नक्षत्रे नजीक वाटत होती. संतोषचे घर प्रशस्त आहे. सारवलेले अंगण पथाऱ्या पसरायला साजेसेच आहे. स्वच्छतागृहाची सोय आहे.
      पहाटेच उठलो आणि चहा घेऊन सरळ पश्चिमेकडे निघालो. अजून सूर्योदय व्हायचा होता. अर्ध्या तासात एका निमुळत्या सोंडेवर येऊन पोचलो. इथे कडा उतरण्यासाठी एकापाठोपाठ एक अशा तीन शिड्या आहेत. पूर्वीच्या लाकडाच्या शिड्यांची जागा आता लोखंडी शिड्यांनी घेतली आहे. आम्हाला कोकणात उतरायचे नव्हते म्हणून आम्ही फक्त शिड्या उतरून परत वर आलो. इथे कड्यात एक शेंदूर फासलेला गणपती आहे, जो कोकणातून येणाऱ्यांना दीपस्तंभासारखा वाटत असतो. इथून रसाळ-सुमार-महिपत ही दुर्गत्रयी दिसली तसेच उत्तरेकडे खोगीराच्या आकाराचा मधुमकरंदगड लक्ष वेधून घेतो. परत गावात आलो. चहा पोह्यांचा नाश्ता केला. संतोषला प्रतिमाणशी ४००रूपये दिले.  झटपट आवरून वलवणच्या दिशेने गावाबाहेर पडलो. वलवण ते शिंदी कच्चा रस्ता आहे. गावात थंडगार "माझा" पिऊन शीण घालवला. चकदेवच्या कड्याचा  निरोप घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो.

Tuesday, 20 February 2018

हरिहर किल्ला (Harihar/Harshgad)


           'चला जाता हूँ किसी की धून में
         धडकते दिल के तराने लिए'
कारमधल्या म्युझिक सिस्टमवर या गाण्याचा आस्वाद घेत आम्ही नाशिकहून त्र्यंबकेश्वर रस्त्याने हरिहर किल्ल्याकडे निघालो होतो. आणि "धडकता दिल" किती जोरात धडकू शकतो याचा अनुभव आम्हाला आता काही वेळातच येणार होता. हरिहर हा त्र्यंबक रांगेतील किल्ला. निसर्गाची रचना आणि मानवाची दुर्गमाला सुगम करण्याची धडपड याचे सुरेख मिश्रण या किल्ल्यात आढळते.
        नाशिक - खोडाळा रस्त्यावरील निरगुडपाडा हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव. गावातून किल्ल्याचा पहाड आकाशात घुसलेला दिसतो. किल्ल्यापासून डावीकडे एक सोंड उतरलेली दिसते. या सोंडेची दिशा धरून चालायला सुरुवात केली. आधी शेताडी पार करून मग चढ सुरू झाला. हाश्शहुश्श करत तासाभरात सोंडेच्या माथ्यावर पोचलो. इथून ढगांशी गप्पा मारणारा किल्ल्याचा कातळ भेदक दिसत होता. कातळात खोदलेली तिरकी रेघ उत्सुकता वाढवत होती. जसजसे किल्ल्याच्या जवळ जाऊ लागलो तसतशी ही रेघ स्पष्ट होऊ लागली. ही रेघ म्हणजे दुसरेतिसरे काही नसून सुमारे १५० पायर्‍यांचा अखंड जिनाच आहे.
         या पायर्‍या हेच किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. १८१८ साली ब्रिटिशांनी जेव्हा महाराष्ट्रातील सर्व किल्ले जिंकले तेव्हा बहुतांश किल्ल्यांवरील पायर्‍या तोडून हे किल्ले पुन्हा वापरण्यास निकामी करून टाकले. मात्र हा किल्ला जिंकणारा कॅ. ब्रिग्ज या पायर्‍या पाहून इतका विस्मयचकित झाला की त्याने त्यांचे नुकसान केले नाही. छिन्नी - पहार - हातोड्याशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसताना काहीशे वर्षांपूर्वी या पायर्‍या कश्या खोदल्या असतील या विचाराने आपण आजही अचंबित होतो.
       सुरुवातीला सुमारे ६० अंश कोनात असणारा हा जिना, जसेजसे आपण वर जाऊ तसेतसे त्याचे खरे रूप दाखवण्यासाठी आपला कोन वाढवत नेतो. आणि 'धडकत्या दिलाची' नव्याने अनुभूती घेत आम्ही पहिल्या दरवाज्यात पोचलो. इथून पुढे सरळ वर चढण्यासाठी जागा नसल्याने कातळ खोदून आडवी वाट तयार केली आहे. या वाटेने जाताना डावीकडे दरीत पाहिल्यावर डोळेच फिरतात. इथून पुढे परत एक नागमोडी वळणांचा जिना माणसाच्या थिटेपणाची व निसर्गाच्या रौद्रतेची जाणीव करून देतो. या जिन्याच्या आधी दुसरा आणि नंतर तिसरा दरवाजा लागतो. द्विपादाचे चतुष्पाद होत आपण या दरवाज्यात पोचतो. इथे पुन्हा कॅ. ब्रिग्जच्या 'केवळ पाच सैनिक हा किल्ला कितीही प्रबळ शत्रूविरूध्द झुंजवत ठेवू शकतात' या उद्गारांची आठवण झाली. किल्ल्यावर येण्याचा हा एकमेव मार्ग आहे कारण इतर सर्व बाजूंनी तुटलेले कातळकडे आहेत.
     किल्ल्याच्या माथ्यावर पोचल्यावर प्रथम समोर एक मोठा तलाव दिसतो. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. इथे काठावर एक शिवपिंडी आणि मारुतीची मूर्ती आहे. समोर लांबवर एक बांधीव वास्तू दिसत असते. तिथे गेल्यावर समजते की ते एक कोठार आहे. इथेही काही पाण्याची टाकी आहेत. हे पाहून तलावापाशी परतले की हरिहरच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. इथून लांबवरचे दृश्य न्याहाळत बसले की वेळ कसा जातो तेच कळत नाही. इतक्या उंचीवरून शेते, कुरणे, छोट्या - मोठ्या वाड्या पाहताना काहीतरी जिंकल्याचे समाधान मिळत असते. रोजच्या जीवनातील घड्याळाच्या काट्यावर चालणारी धावपळ मागे पडलेली असते. किल्ला चढताना घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याची भावना दाटून येते. मोकळे आकाश, भन्नाट वारा आणि एकांत यांची मैफल जमून येते. ही मैफल किती वेळ रंगेल ते सांगता येत नाही.
      उन्हं कलायला लागल्यावर आपल्याला आता जिना सुरक्षितपणे उतरायचाही आहे या विचाराने वास्तवात परतलो. प्रत्येक पाऊल सावधपणे खाली घेत, खोदीव खोबण्यांचा आधार घेत खाली आलो. खाली गावात पार्क केलेली कार ठिपक्याएवढी दिसत होती, तिचा रोख धरून किल्ल्याचा निरोप घेतला.